बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ परभणीत आयोजित जनआक्रोश मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी झाले. मोर्चात भाषण करताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत काही आक्षेपार्ह विधानं केली.
जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावरून परळी पोलीस ठाण्यात तुकाराम बाबुराव आघाव यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मनोज जरांगे यांनी परभणीतील मोर्चात धनंजय मुंडे यांच्याविरोधात बदनामीकारक शब्दांचा वापर करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या पालकमंत्रिपदावर आणि मंत्रिपदावर संकट उभं राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार मराठा समाजातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.