बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंडे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात त्यांचा कोणताही संबंध नाही आणि राजीनामा देण्याचे कारण नाही.
मुंडे यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, तसेच न्यायालयातही या प्रकरणाचा तपास होणार आहे. “माझ्या मंत्रीपदामुळे तपासावर कोणताही दबाव येणार नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने सुनावणी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी,” असे मुंडे म्हणाले.
या प्रकरणात आरोपींच्या संबंधांवर विचारले असता, धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितले की, “संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अगदी तो माझ्या जवळचा असला तरीसुद्धा.”
विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर त्यांनी उत्तर दिले की, त्यांच्या उपस्थितीमुळे तपासात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच, त्यांनी या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सखोल तपास सुरू असून दोषींना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कठोर शिक्षा दिली जाईल, असे मुंडे यांनी नमूद केले आहे.