बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडानं राज्यभरात संतापाची लाट उसळली असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत.

पंढरपूरमधील आक्रोश मोर्चा

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात विविध पक्षांचे नेते आणि संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या मोर्चात उपस्थित होते.

रामभाऊ गायकवाड यांचा आक्रमक इशारा

या मोर्चामध्ये मराठा नेते रामभाऊ गायकवाड यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. “जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना राज्यात फिरू देऊ नका. दगडं घेऊन त्यांच्यासमोर उभं राहा. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना राज्यात फिरू द्यायचं नाही,” असा इशारा गायकवाड यांनी दिला.

भावनिक झालेल्या संतोष देशमुख यांच्या कन्या

या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख भावनिक झाल्या. त्यांनी विठ्ठलाला साकडे घालून न्यायाची मागणी केली. “माझ्या वडिलांनी एकही वारी चुकवली नाही. माझ्या वडिलांना क्रूर पद्धतीने मारण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे,” असे भावनिक शब्द त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आरोपींवर मकोकाची कारवाई, अद्याप एक आरोपी फरार

या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. पोलिसांचे विशेष पथक त्याचा शोध घेत असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

राजकीय दबावाखाली तपास?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप देखील समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

आरोपींना कठोर शिक्षा आणि कुटुंबाला न्यायाची मागणी

राज्यात संतोष देशमुख हत्याकांडामुळे खळबळ माजली असून लोक न्यायासाठी एकत्र येत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा मिळेल का आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love