बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या सीआयडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जातात. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “सरपंचाची हत्या झाली आहे, त्या हत्येचं राजकारण होऊ नये. आरोपी कुठेही गेले असतील किंवा कोणीही मदत केली असली, तरी त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये; समाजात सुधारणा व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला, तरी आम्ही तसं होऊ देणार नाही. जे कोणी दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुशंगाने दादागिरी, हप्ते वसुली करणाऱ्यांवर जरब बसवण्याचं आम्ही ठरवलं आहे, आणि त्याबाबत योग्य कारवाई सुरू आहे.”
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह इतर काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले आहे.