संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे. आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीसाठी आलेल्या मुंडे यांना पत्रकारांनी घेरले असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही.”

काल धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटींमुळे मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

संतोष देशमुख हत्येप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड, जो मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो, अटकेत आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांसह बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी करत आहेत.

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले, “आरोप करणाऱ्यांना आरोप करू द्या. मला सत्यावर पूर्ण विश्वास आहे.”

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, मुंडे यांच्यावर वाढत्या दबावामुळे पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *