मुख्यमंत्री व धनंजय मुंडे भेट

बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड २२ दिवसांपासून फरार होता. या काळात तो उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेला तसेच पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे सर्व घडत असताना सीआयडी आणि पोलीस प्रशासनाला याचा ठावठिकाणा लागला नाही, यावर छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“पोलिसांना कराडच्या हालचालींची माहिती नव्हती का?”

वाल्मिक कराडच्या फरारीच्या काळातील हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संभाजी राजे म्हणाले, “२२ दिवस कराड उज्जैनसारख्या ठिकाणी देवदर्शन घेतो आणि पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेतो, पण सीआयडी आणि पोलीस प्रशासनाला याचा काहीही पत्ता लागत नाही, हे त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न निर्माण करते.”

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संशय

वाल्मिक कराडने मंगळवारी पुण्यात सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. मात्र, याआधी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली. या घटनेला जोडत संभाजी राजे भोसले यांनी प्रश्न केला की, “धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच कराडने आत्मसमर्पण केले. यात काही कनेक्शन आहे का? याची चौकशी झाली पाहिजे.”

संपूर्ण तपासाची मागणी

संभाजी राजे भोसले यांनी या प्रकरणातील घडामोडींवर पूर्णपणे पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. “या प्रकरणात पोलीस आणि राजकीय हस्तक्षेपाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. विशेषतः कराडच्या फरारी काळातील हालचालींवर लक्ष केंद्रित केले जावे,” असे ते म्हणाले.

सरकारवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली आहे. “आरोपी इतक्या दिवसांपासून फरार असतानाही तो स्वच्छंदपणे फिरतो, याला सरकारचे संरक्षण आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तपासावर राज्याचे लक्ष

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी सीआयडी आणि पोलीस प्रशासनावर मोठ्या जबाबदारीची अपेक्षा आहे.

Spread the love