नागपूर: योगगुरू बाबा रामदेव यांनी औरंगजेबाच्या क्रूरतेवर तीव्र शब्दांत टीका करत, “औरंगजेब हा भारताचा आदर्श कधीच होऊ शकत नाही, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत,” असे वक्तव्य केले. नागपुरातील पतंजली फूड पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

रामदेव बाबांनी औरंगजेबाच्या अमानुष राजवटीवर टीका करत त्याला “लुटारू खानदानाचा वारसदार” असे संबोधले. “बाबर असो की औरंगजेब, ते भारताला लुटण्यासाठी आले होते. औरंगजेबाने हजारो महिलांवर अत्याचार केला, मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदू संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला. असा माणूस कधीच भारताचा आदर्श असू शकत नाही,” असे रामदेव बाबांनी ठामपणे सांगितले.

धार्मिक दहशतवादावरही कठोर भूमिका

रामदेव बाबांनी केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सध्याच्या घडामोडींवरूनही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत, “युरोप, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सनातन धर्मावर हल्ले होत आहेत. मजहबी आतंकवाद पचवला जात आहे, ही चिंतेची बाब आहे. यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत आणि भारताने यासाठी पुढाकार घ्यायला हवा,” असे आवाहन केले.

‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबाच्या क्रौर्याची पुन्हा चर्चा

सध्या चर्चेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबाच्या अत्याचारांविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनेक इतिहास संशोधक आणि राजकीय नेते औरंगजेबाच्या क्रूरतेवर प्रकाश टाकत आहेत. काही नेत्यांनी तर औरंगजेबाची कबर हटवण्याचीही मागणी केली आहे.

रामदेव बाबांचे हे वक्तव्य या चर्चेला नवीन वळण देणारे आहे. त्यांच्या या भूमिकेचे देशभरात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Spread the love