मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलेआम पाठिंबा देत त्यांच्या निर्णयांचे कौतुक केले आहे. फडणवीस यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे स्वागत करत, त्यांनी “महाराष्ट्राच्या हितासाठी हा योग्य निर्णय घेतला आहे” असे स्पष्ट केले.

फिक्सर आणि चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना मान्यता नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांनी शिफारस केलेल्या पीए (वैयक्तिक सहाय्यक) आणि ओएसडी (विशेष कर्तव्य अधिकारी) नियुक्तीप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. फिक्सर आणि चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांची नावे त्यांनी मंजूर केली नाहीत, याच निर्णयाचे संजय राऊत यांनी कौतुक केले आहे.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “मंत्र्यांकडून आलेल्या 125 नावांपैकी 109 नावे मंजूर केली आहेत, पण उर्वरित नावे मंजूर केली नाहीत. कारण त्यांच्यावर आरोप आहेत किंवा चौकशी सुरू आहे.” कोणत्याही दबावाला बळी न पडता हा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

संजय राऊत यांनी ही सर्व नावे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडूनच शिफारस झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही आवाहन केले की, “फिक्सर अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत.” त्यांनी असेही सांगितले की, “ही नावे माझ्याकडे देखील आहेत.”

मागील सरकारवर गंभीर आरोप

राऊत यांनी मागील सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावले. ते म्हणाले, “गेल्या अडीच ते तीन वर्षांत महाराष्ट्रात आर्थिक आराजकता माजली होती. 500 कोटींच्या टेंडरचे मूल्य 5000 कोटींपर्यंत वाढवले गेले. ठेकेदारांकडून कोटीच्या कोटी उचलले गेले.”

त्यामुळे देवेंद्र फडणवीस जर या भ्रष्टाचाराला थांबवण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

राजकीय घडामोडींना वेग

या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, तर राऊत आणि फडणवीस यांच्यातील राजकीय समीकरणे नव्याने चर्चेत आली आहेत.

– टीम गावगाडा डॉट कॉम

(ताज्या घडामोडींसाठी आमच्या वेबसाइट आणि यूट्यूब चॅनलला भेट द्या)

Spread the love