बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली असून, त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. तर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना आका हा तिसराच व्यक्ती असल्याचे सांगितले.
केज न्यायालयाचा निर्णय
पोलिसांनी आरोपींच्या 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र केज न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केली. तपासादरम्यान आरोपींनी हत्येबाबत कोणताही पश्चाताप व्यक्त केलेला नाही, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी या दाव्याला विरोध केला. त्यांनी सांगितल की या प्रकरणातील आका हा तिसराच आहे.
या प्रकरणात वारंवार “आका”चा उल्लेख होत असून, आमदार सुरेश धस यांच्याही भाषणातून “आका”वर टीका करण्यात आली होती. आरोपींच्या वकिलांनी “आका” म्हणजे विष्णू चाटे असल्याचा दावा केला आहे. विष्णू चाटे याला यापूर्वीच अटक झाली असून तो सध्या कोठडीत आहे, असे वकिलांनी कोर्टात मांडले. या आरोपामुळे प्रकरणातील राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
तपासातील प्रगती
या हत्याकांडात आतापर्यंत प्रमुख आरोपींसह जवळपास सर्वांना अटक करण्यात आली आहे. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडे आणखी काही महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी तपासात अधिक माहिती गोळा करण्यासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी केली होती.
राजकीय वातावरण तापले
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग परिसरासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात स्थानिक नेत्यांनी तसेच आमदार सुरेश धस यांनी उघड भूमिका घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. “आका”बाबत सुरू असलेल्या वादामुळे या प्रकरणाने राजकीय रंग घेतला असून, पुढील तपासातून सत्य उघड होण्याची अपेक्षा आहे.
हे प्रकरण केवळ गुन्हेगारी नव्हे तर राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकत असल्याने पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.