मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असताना, शिवसेना शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटाचे सहा खासदार आगामी संसदेच्या अधिवेशनापूर्वी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘ऑपरेशन टायगर’ म्हणजे काय?

शिंदे गटाने याआधीच ठाकरे गटाच्या आमदारांना आपल्या बाजूने खेचत मोठी राजकीय खेळी केली होती. आता ठाकरे गटाच्या सहा खासदारांना शिंदे गटात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत संकेत दिले होते आणि शिवसेना (शिंदे गट) ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत थेट संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

खासदारांच्या मनधरणीला यश?

ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी केली असली तरी केंद्रात महायुती सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहण्याऐवजी भाजपच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात जावे, अशी उबाठा गटाच्या काही खासदारांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्षांतर बंदी कायद्यामुळे सहा खासदारांचा आकडा गाठणं गरजेचं आहे. त्यामुळे या सहा खासदारांची जुळवाजुळव पूर्ण झाली असल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे.

खासदारांचे नाव गुप्त, पण हालचाली वेगवान!

सध्या या सहा खासदारांची नावे समोर आलेली नसली तरी शिवसेनेत लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार आहेत. त्यातील सहा जण शिंदे गटात गेले, तर उबाठा गट मोठ्या अडचणीत सापडू शकतो.

शिंदे गटाला भाजपची साथ?

या घडामोडींमध्ये शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. कारण जर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढली, तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यामुळे भाजपही हा डाव यशस्वी करण्यासाठी मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे.

आता पुढे काय?

ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार असल्याचे शिंदे गटातील मंत्र्यांचे म्हणणे आहे. शिवाय, केवळ खासदारच नव्हे, तर उबाठा गटातील काही आमदारही शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, हे आमदार कोण आणि ते कधी शिंदे गटात प्रवेश करतील, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

ठाकरे शिवसेनेत पुन्हा फूट पडणार?

उद्धव ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. आता उद्धव गटातील सहा खासदार आणि काही आमदार फुटल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *